कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात मनमानी व अनागोंदी कारभार राजाराम गरुड : उपवनसंरक्षकांना दिले निवेदन : भाजपच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात मनमानी व अनागोंदी कारभार
राजाराम गरुड : उपवनसंरक्षकांना दिले निवेदन : भाजपच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
कडेगाव : कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात मनमानी व अनागोंदी कारभार सुरु आहे.याबाबत संबंधितावर कठोर कारवाई करावी अन्यथा कडेगाव तालुका भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड यांनी सांगली येथील उपवनसंरक्षक नीता कट्टे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे कडेगावचे वनपाल सर्जेराव ठोंबरे हे कडेगाव येथे मुक्कामी न राहता परजिल्हयात राहत आहेत.तरीही त्यांना बेकायदेशीरपणे भत्ते व घरभाडे वनविभागाकडून अदा केले जात आहे . त्यांना कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांचे अभय आहे.यामध्ये शासनाच्या पैशाचा अपहार होत आहे.तर याला जबाबदार असलेल्या कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांची सखोल चौकशी होवून त्यांना निलंबित करावे.जंगली प्राणी शिकार प्रकरणी ठोस पुरावे नसतानाही कडेपूर येथील महाविद्यालीन तरुणाला वनगुन्हयात नाहक गोवले आहे , त्याची चौकशी व्हावी.खंबाळे औंध येथे वन्य प्राण्याची शिकार झाली होती त्याची राज्य शासनाकडे ऑनलाईन तक्रार झालेली होती,त्याची चौकशी झाली नाही व कोणावरही कारवाई झाली नाही त्याची चौकशी व्हावी.कडेगाव पलूस वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत वन्य प्राणी व मनुष्य याच्यात संघर्ष कमी करण्यासाठी गस्त पथक केवळ कागदावरच नेमले आहेत प्रत्यक्षात जागेवर दिसून येत नाहीत.तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीत व दुर्घटनेत वाढ झाली आहे.या कडे कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.वन क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदा वृक्षतोड होत आहे,याकडे येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील खंबाळे औध ते आंबेगाव दरम्यान गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झालेली आहे .
त्यासाठी दिलेल्या परवानगीची सखोल चौकशी व्हावी.तसेच येथे अजूनही नव्याने वृक्ष लागवड झाली नाही याबाबतही संबंधितांवर कारवाई करावी.तालुक्यातील उपाळे वांगी,चिंचणी,वांगी,सोनकिरे,नेर्ली,अपशिंगे,शाळगाव येथे मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेली वनविभागाची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून यामध्ये भ्रष्ट्राचार झाला आहे. तसेच सदर कामे मुदतीत पूर्ण झाली नाहीत.याला जबाबदार संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तरी या मागण्यांच्या अनुषंगाने आपले व वरिष्ठ स्तरावरुन संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी.अन्यथा कडेगाव तालुका भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात नमुद केले आहे.
………..
………………………..………………………..