घराणेशाही संपण्याच्या भीतीने ‘जनतेतून सरपंचा’स विरोध. भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख
घराणेशाही संपण्याच्या भीतीने ‘जनतेतून सरपंचा’स विरोध.
भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांचा आरोप.
कडेपूर प्रतिनिधि.
घराणेशाही संपण्याच्या भीतीने सरपंचाच्या जनतेतून थेट निवडीला महाविकास आघाडी कडून विरोध केला जात असल्याचा आरोप भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी केला.
“नगराध्यक्ष आणि सरपंच” यांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लागवली आहे. सामान्य जनतेतून नेतृत्व पुढे आल्यास ठराविक घराण्याची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भितीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहे,अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यास यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.जनतेची ही तीच मागणी असताना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी आपली घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली आहे असे पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले, सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच राहावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले.