माडगूळ येथील गदिमाचे घर स्मारक म्हणून शासनाने जतन करावे भाजप नेते राजाराम गरुड यांची ना. मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
माडगूळ येथील गदिमाचे घर स्मारक म्हणून शासनाने जतन करावे
भाजप नेते राजाराम गरुड यांची ना. मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
सांगली : प्रतिनिधी
आधुनिक काळातील वाल्मिकी म्हणून विख्यात असलेले कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे माडगुळे येथील घर शासनाने विशेष निधी देऊन स्मारक म्हणून विकसित करावे अशी मागणी भाजपचे नेते आणि राजाराम गरुड यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात सांगलीत राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.तसेच या विषयासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
श्री. गरुड यांनी निवेदनात म्हटले आहे की ग. दि. माडगूळकर यांनी मराठी साहित्याचे क्षेत्र समृद्ध केले आहे.त्यांच्या गीतरामायनाने रसिकांची रसिकांच्या पसंतीची न भूतो न भविष्यती अशी उंची गाठली आहे. अनेक कथा, कविता, चित्रपट गीते तसेच अनेक चित्रपटांच्या पटकथा असे समृद्ध वाग्मय गदिमांनी निर्माण केले आहे.
माडगुळे( तालुका आटपाडी )येथील गदिमांचे घर बामणाचा पत्रा म्हणून ओळखले जाते.त्या ठिकाणी त्यांचे अनेक दिवस वास्तव्य होते. त्या ठिकाणीच त्यांनी अनेक अजरामर अशा साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. परंतु सध्या त्यांच्या या घराची पडझड होत आहे. दुरवस्था झाली आहे त्या ठिकाणी शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गदिमांचे उचित असे स्मारक आटपाडी तालुक्यात नाही. वास्तविक ते पूर्वीच होणे आवश्यक होते.माडगुळे येथील त्यांच्या या बामणाचा पत्रा या घराचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी गदिमांच्या साहित्याची माहिती देणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ अशा स्वरूपाच्या संग्रह करणे आवश्यक आहे. तसेच गदिमांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शनही तेथे कायमस्वरूपी ठेवणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तातडीने याबाबत पावले उचलावीत आणि मराठी रसिकांना दिलासा द्यावा.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक साहित्यिकांची स्मृती जपण्यात आली आहे. कोकणामध्ये कविवर्य केशवसुत, नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदि मान्यवर साहित्यिकांची स्मृती जपण्यात आली आहे. परंतु गदिमाएवढा थोर साहित्यिक आणि कवी तसेच लोकसेवक सांगली जिल्ह्यातच उपेक्षित राहिला आहे. तरी शासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत.
कविवर्य ग. दि. माडगूळकर आणि प्रख्यात गायक सुधीर फडके (बाबूजी )यांनी गीत रामायणाच्या रूपाने महाराष्ट्रातीलच नव्हे ;तर महाराष्ट्रबाहेरही प्रत्येक घराघरात श्री प्रभू रामचंद्रांची महती आणि जीवन कार्य पोचवले आहे.अयोध्येमध्ये जानेवारी महिन्यात श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री प्रभू रामचंद्रांचे महान जीवन कार्य घराघरात पोहोचवणाऱ्या गदिमांचे स्मारक होणे समायोजित ठरेल.
यावर्षीच्या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करून किंबहुना त्यापूर्वीही गदिमांच्या माडगूळ येथील या घराचा स्मृतीस्थळ म्हणून तातडीने विकास करावा अशीही मागणी श्री. गरुड यांनी केली आहे.